खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील कासमवाडी परिसरात घडलेल्या खूनाच्या थरारक घटनेनंतर, केवळ काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
घटना कशी घडली?
दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या रात्रीच्या सुमारास, कासमवाडी परिसरात जुन्या वादातून ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय २७) या तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, तिची नोंद सीसीटीएनएस गु.र. नं. ७०६/२०२५, भारतीय नवसंहितेतील कलम १०३ अंतर्गत करण्यात आली होती.
मुख्य आरोपीला काही तासांतच अटक
या खुनाचा मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) हा घटनेनंतर पसार झाला होता. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोकॅ. छगन तायडे, व पोकॉ. रविंद्र कापडणे यांच्या पथकाने काम सुरू केले. गोपनीय माहितीच्या आधारे, नशिराबाद परिसरात आरोपी लपल्याची माहिती पथकाला मिळाली. लगेचच शिताफीने कारवाई करत पथकाने आरोपी पिंटू पाटील याला अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या सूचनांमुळे आणि पथकाच्या तात्काळ व अचूक कारवाईमुळे खुनाचा मुख्य आरोपी काही तासांतच पोलीसांच्या ताब्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत असून, गुन्ह्याच्या मागील पार्श्वभूमीचा तपास, अन्य साथीदारांची चौकशी आणि गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Tags
Jalgaon